रोहिदास शिखर परिक्रमा , माकडनाळ मार्गे...

पहाटे बेलपाड्याकडे जाताना


Add caption

सकाळी बेलपाड्यातून दिसणारा हरिश्चंद्र गड

भाग पहिला ...

बऱ्याच दिवसापासून गड किल्ले , फोटोग्राफी , सायकलिंग साठी भटकंती होत असते. खूप साऱ्या गोष्टी मनाला भावतात त्या शब्द रुपात ब्लॉगमध्ये उतरल्या तर चिरकाल लक्षात राहतील . या हेतूने व बऱ्याच जवळच्या मित्रांनी आग्रह केल्या मुळे ब्लॉग चे लिखाण सुरू करत आहे.

नुकताच २८ व २९ नोव्हेंबर २०२० रोजी रोहिदास शिखर परिक्रमा ट्रेक पूर्ण केला. त्या ट्रेकच्या दरम्यान घडलेले प्रसंग , फोटो या ब्लॉग मध्ये मी लिहीत आहे. 

ट्रेकर लोकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. नाशिककरांना राजूर , पाचनई मार्गे सोपा आणि सोईस्कर आहे. त्याशिवाय टोलरखिंड, खिरेश्वर मार्ग मुंबई , पुणे कर जास्त वापरतात. 

हे मार्ग पाहून झाले की ट्रेकर लोकांना नळीची वाट , माकड नाळ हे अवघड, रोमांचकारी मार्ग खुणावू लागतात. मागच्या वर्षी आम्ही एकाच दिवसात नळीच्या वाटेने चढाई करून कोकणकडा फेर फटका मारून बैल घाट व साधले घाट मार्गे ट्रेक पूर्ण केला होता. पहाटे पाच वाजता चालू केलेला ट्रेक संध्याकाळी १०=३० वाजता संपला होता. त्याच वेळी आमचा गाईड कमळू ने समोरची माकड नाळ दाखवली होती. तेव्हा पासून ह्या मार्गे कधीतरी नक्की जाऊ असे ठरवले होते. 

त्यानंतर सह्याद्रीची घोरपड, कोकणकडा पुत्र अशी ओळख असलेले स्वर्गीय अरुण सावंत सर, सूरज मालुसरे, संजय अमृतकर, तुषार कोठावदे व ग्रुप यांनी माकडनाळ मार्गे हा ट्रेक केला होता. त्यावेळी त्यांनी माकड नाळेतील एका अवघड अशा रॉक पॅच ला बोल्ट मारले होते. जेणे करून इतर ट्रेकर सुरक्षित नाळ चढू शकतील. त्यानंतरच्या कोकणकडा रॅपलिंग व ट्रॅव्हर्स करतांना अरुण सावंत सरांचा दुर्दैवी अंत झाला, अरुण सावंत सर कोकणकड्यात कायमचे सामावले ... 😢 

जी व्यक्तीने दुसऱ्या ट्रेकरचा जीव जोखिमेत अडकू नये म्हणून स्वखर्चाने बोलटिंग करते. पण त्यांच्यावरच असा वाईट प्रसंग ओढावला यासारखे दुसरे दुर्दैव ते काय असू शकते.  याच घटनेच्या पार्श्वभूमीवर  त्यांचे पाऊल ज्या नाळेतून गेले त्याच मार्गे जाऊन स्वर्गीय अरुण सावंत सरांना श्रद्धांजली अर्पण करायची असे मनोमन ठरविले होते. हा माझा पहिला ब्लॉग त्यांच्या स्मृतीस समर्पित ...

त्यानंतर जगभर कोविड चा हाहाकार माजला, पावसाळा चालू झाला. त्यामुळे आमची ही मोहीम थंडावली होती. पावसाळा संपला , रस्ते , वाहतूक , ट्रेक चालू झाले आणि परत एकदा माकड नाळ मार्गे रोहिदास शिखर परिक्रमा करायची असे ठरले. 

२७ तारखेला शुक्रवारी रात्री ८ वाजता निघून १२ ते १ वाजे पर्यंत बेलपाड्याला पोहचून आराम करायचा व पहाटे पाच / सहा वाजता ट्रेक चालू करायचा असे ठरले होते. आमच्या गिरिदुर्ग भटकंती ग्रुपवर तशी पोस्ट टाकली गेली. ट्रेक अवघड आहे फक्त अनुभवी लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. जास्तीत जास्त १५ लोक बरोबर घ्यायचे असे ठरविले होते. तरीही २३ लोकांनी येण्यासाठी होकार दिला. 

२५ सीटर बस सांगितली होती. रात्री ८ वाजता येणारी बस १०=१५ वाजता आली. चला हरकत नाही सर्व जण बसले, गणपती बाप्पा मोरया, शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्या गेल्या. वाडीवर्हे च्या पुढे निघालो आणि ड्रायव्हर ने बस एका बाजूला घेतली. बसचे मागचे एका बाजूने दोन्ही टायर पंचर झाले होते. बस मध्ये एकच स्टेपनी होती. पंचर चे दुकान दीड किमी लांब होते. आमच्या काही तरुण सदस्य ते टायर हायवे वरून लोटत पंचर च्या दुकानाकडे निघाले. पंचर वाला आजारी होता त्याने पंचर काढायला नकार दिला. परत पुढच्या १ किमी वर पंचर दुकान होते तेथपर्यंत जाणे भाग होते. बस ला एका बाजूला एकच टायर लावून रिकामी बस कशी तरी त्या पंचर दुकानात पोहचली. रात्री चे बारा वाजून गेले होते. पंचर वाला तर्राट होऊन झोपला होता. त्याने पंचर काढायला अगोदर होकार देऊन नंतर नकार दिला. रात्रीचे दीड वाजला होता. आमच्या कंपनीची सहन शिलता संपत आली होती. विनंती करूनही पंचर काढून ऐकत नाही म्हणल्यावर प्रकरण हातघाई वर गेले. आजू बाजूचे लोक जमा झाले प्रकरण चिघळत चालले होते. वाद नको म्हणून मध्यस्थी करून प्रकरण मिटवले , परत पुढच्या एका दुकानात वरात निघाली. 

तेथे एक १७ /१८ वर्षाचा मुलगा होता. त्याने पंचर काढायला लगेच तयार झाला. आमचा बस ड्रायव्हर दिवस भर ड्राइविंग करून थकला होता. तो झोपून गेला. आमचे तरुण तुर्क पंचर काढणाऱ्या राजुच्या मदतीला सरसावले. त्याने दोन्ही टायर पंचर काढून व्यवस्थित बसवून दिले . घडयाळात तीन वाजले होते. आराम , झोप तर नाहीच नाही पण ट्रेक होईल की नाही या बाबत शंका येऊ लागली होती. पंचर वाल्या राजुचे बिल ३०० रुपये झाले होते. आमच्या मंडळीने ४०० रुपये दिले व त्याचे आभार मानले.

अशा प्रकारे पहाटे साडे तीन वाजता निघून आम्ही बेल पाड्यात सकाळी ७ वाजता पोहचलो. अवघड ट्रेकची सुरुवात अशी अवघड होईल अशी कोणी कल्पना केली नव्हती. मात्र आम्ही पोहचलो आणि ट्रेक होऊ शकतो या कल्पनेने सर्व त्रास विसरून आनंदी झालो होतो. 

टिप्पण्या

  1. ट्रेकची सुरुवातच रोमांचक...मस्त मामाश्री.

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम मामा व गिरिदुर्ग टीम
    जय भवानी जय शिवराय

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम लेख आहे. आपण अतिश चांगले काम सुरु केले आहे. आपणांस प्रा. डांगे सर व सौ. पुष्पा डांगे यांचे कडून मनस्वी शुभेच्छा आणि आशीर्वाद !!!

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम लिखाण मामा जी खूपच छान सुरवात पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा आणि पुढील blog ची आतुरते वाचना साठी वाट पाहतो.

    उत्तर द्याहटवा
  5. मामा,पंचर वाल्याशींच काय परंतु कुठल्याही ठिकाणी "हातघाईवर"आलेलं प्रकरण तुम्ही लिलया मिटवु शकतात.

    उत्तर द्याहटवा
  6. दिलीप मामा आपले काम खूपच कौतुकास्पद आहे.खूप सुंदर ब्लॉग झाला.
    खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  7. सुरेख शब्दांकन अगदी सफरीचा आनंद (अनुभव) घेतला वाचनात. छान सुरुवात
    आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या ब्लॉग ची आतुरतेने वाट पाहतोय.

    उत्तर द्याहटवा
  8. अतिशय सुंदर लिखाणासाठी सुरुवात.
    अभिनंदन.......


    माकड नाळ.......

    सुरुवात रोमांचकारी आहे, पुढचे वाचनासाठी उत्सुकता वाढलीये........

    उत्तर द्याहटवा
  9. अतिशय सुंदर 👌🏼 आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🌷

    उत्तर द्याहटवा
  10. अति सुरेख वर्णन आहे . शेवटी कोणीतरी म्हटलेच आहे -
    "अगर तुम किसी चीज को शिद्दत से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती है । "😍☝🏽🏔️🏔️

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रोहिदास शिखर परिक्रमा , माकडनाळ मार्गे...